वाघोली-बकोरी रोड बनविण्यासाठी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

पुणे, : वाघोली येथे गेल्या दशकांपासून प्रलंबित असलेल्या बकोरी रोड समस्येबाबत वाघोली अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशन (टीम वाको) च्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरु असून आज तिसरा दिवस आहे. तरीदेखील प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. तसेच आज अन्न त्यागाचा तिसरा दिवस असून जर प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर पाणी त्याग करण्याचा निर्णय अनिल कुमार मिश्रा यांनी दिला आहे. नागरिसकांचे आणि विविध संघटनांचे या आमरण उपोषणाच्या आंदोलनास पाठिंबा भेटत आहे. परंतु अद्याप एकही लोकनेत्याकडून किंवा शासकीय प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन किंवा लोक प्रतिनिधी जागे होणार का असा सवाल पाठिंबा देणाऱ्या नागरिसक आणि विविध संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच काल रात्र भर मुसळधार पाऊस पडत होता या पावसात सुद्धा अनिल कुमार मिश्रा यांचे आंदोलन सुरूच होते .
बिल्डर्स यांच्या संगनमतामुळे टाऊन प्लॅनिंगमध्ये दाखवलेला 60 फूट बकोरी रोड प्रत्यक्षात कधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तरीसुद्धा बिल्डर्सना परवानग्या, टाऊन प्लॅनिंग मंजुरी व भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. नागरिकांकडून कर व विकास शुल्क वसूल करूनही आज रस्ता नाही, केवळ 9 फूट अरुंद रस्त्यावर जीव धोक्यात घालून रहिवाश्यांना प्रवास करावा लागतो. या फसवणुकीमुळे दररोज गंभीर अपघात, ट्रॅफिक कोंडी व प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याच साठी स्थानिक रहिवाशी रस्त्यावर उतरले असून आमरण उपोषणास बसले आहे. शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण सुरु केले असून आज तिसरा दिवस आहे.
पीएमआरडीए ने अनेक टाऊन प्लॅनिंग मंजुरी रस्ता अस्तित्वात नसताना कशा दिल्या, याची चौकशी करून दोषी बिल्डर्स व जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.-आजपर्यंत कलेक्टर व संबंधित प्रशासनाने नागरिकांना बकोरी रोड उपलब्ध करून का दिला नाही, याबाबत स्पष्ट व लेखी खुलासा करण्यात यावा. शासनाने आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून शेतकर्यांना योग्य मोबदला द्यावा. -वाघोली शहरातील बकोरी रोड तसेच इतर रस्ते तातडीने रुंदीकरण करून सुरक्षित व मान्यताप्राप्त रस्ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, अश्या मागण्या टीम वाकोचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी केलल्या आहेत. हे आंदोलन बकोरी रोड उपलब्धते सारख्या मूलभूत गरजेसाठी आहे. जोपर्यंत प्रशासन ठोस कार्यवाही करत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील.