भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी

भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी
प्रत्येक भारतीयाने सायबर हल्ल्याप्रति दक्ष रहावे!
 
निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांचे मत
 
पहगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट होती. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन हलचाली सुरु होत्या, त्यानुसार काहीतरी मोठं घडणार असा प्रत्येकालाच विश्वास वाटत होता. त्यानंतर जे घडलं , ते सर्व जगाने पाहिले. भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, अशी भावना माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, एस. एस. हसबनीस आणि एअर मार्शल एस. एस. सोमण यांनी व्यक्त केले. 
 
युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 'ऑपरेशन सिंदूर - नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार' या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) (PVSM, UYSM, VSM), ले. जनरल एस. एस. हसबनिस(नि.) (PVSM, VSM, ADC), एअर मार्शल एस. एस. सोमण(नि.) (PVSM AVSM VM) यांच्याशी संवाद साधला. आजचा हा संवाद ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडारा आणि भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन मान्यवरांचे विचार ग्रहण केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीततेबाबत बोलताना, माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर म्हणाले की, समोरच्या शत्रूला जर शांततेची भाषा समजत नाही, तर युद्धाशिवाय पर्याय राहत नाही. आज आपल्या सैन्य दलाचे सामर्थ्य एवढे प्रचंड वाढले आहे की, त्याला जगात कशाचीही तोड नाही. आज संरक्षण सामुग्रीच्याबाबत स्वयंपूर्ण झालो आहोत. यासाठी भारत सरकारने दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच हे शक्य झाले अशी भावना व्यक्त केली. 

देशातला प्रत्येक नागरिक हा एक देखील सैनिक आहे. त्यांनी शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी नेहमीच सज्ज असलं पाहिजे. युद्ध हे केवळ सीमेवर लढलं जातं असं नाही; तर अंतर्गत ही लढलं पाहिजे. सायबर हल्ला हे आज आपल्यासमोरचं एक संकट आहे. त्यामुळे त्याविरोधात ही लढण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज असलं पाहिजे, अशी भावना पाटणकर यांनी व्यक्त केली.
 
ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वतयारी आणि यशस्वीतेबाबत लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस म्हणाले,  दहशतवादी हल्ला हे यापूर्वी देखील झाले. पण आज जशास तसे उत्तर देत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यासाठी; जी माहिती संकलित केली होती, त्यासाठी अनेक विभाग कार्यरत होते. यात काही मित्र राष्ट्रांची देखील मदत झाली, अशी भावना व्यक्त केली. 
 
एअर मार्शल एस. एस. सोमण म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये इटिग्रेटी हा अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांनी आपल्याला दिलेले काम अतिशय चोख बजावले. त्यासोबतच या यशस्वीतेसाठी जी इच्छाशक्ती आवश्यक होती, ती पाठिशी खंबीरपणे असल्याने, मोहिम यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली.