सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू; कावळ्यांची गर्दी, नागरिक संतप्त
सोलापूर प्रतिनिधी : शहरातील ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसरात दूषित पाणी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माशांचे हाल होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. तलावातील अनेक मासे पाण्याच्या पृष्ठभागावर आणि काठाजवळ येताना दिसत असून काही मासे मृत अवस्थेत आढळत आहेत.
मृत माश्यांवर ताव मारण्यासाठी कावळ्यांची गर्दी होत असल्याने तलाव परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सकाळपासून फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तलावातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
“तलावातील माशांना ऑक्सिजन मिळत नाही, पाणी दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासन तातडीने उपाययोजना करणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तलावातील पाण्याची तपासणी, एरेशन व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि दूषित पाण्याचा स्रोत शोधून त्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
KS NEWS सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे