“प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती” – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. २८ जानेवारी २०२६ :
उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो.
विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.