राष्ट्रवादीकडून दरवर्षी समता महोत्सव मुंबईत साजरा होणार.

राष्ट्रवादीकडून दरवर्षी समता महोत्सव मुंबईत साजरा होणार.
मुंबई दि. २० मे - जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा दूर करुन शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि स्वाभिमानाच्या मार्गावर समाजाला घेऊन जाणे हीच महामानवाला दिलेली खरी मानवंदना ठरेल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले विचार मांडले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा एका महोत्सवापुरता न ठेवता किंवा तो न राहता तो आपल्या आचार-विचारात उतरवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 
हा महोत्सव नाही तर सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. हे प्रत्येकानी लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेस जसा १ मे हा महाराष्ट्र दिन यावर्षीपासून साजरा करत आहे तसाच दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता महोत्सव दरवर्षी मुंबईत साजरा करायचा अशी घोषणा  अजित पवार यांनी केली. 
डॉ. नरेंद्र जाधव यांना आतापर्यंत ७५ पुरस्कार मिळाले आहेत आणि ते लवकरच पुरस्काराचे शतक पूर्ण करतील असे सांगतानाच अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या कार्याचेही अजित पवार यांनी कौतुक केले.

 

 
सिध्दार्थ कांबळे यांनी समता महोत्सवाचे आयोजन केले त्याबद्दल  अजित पवार यांनी धन्यवाद दिले. 
आम्ही बाबासाहेबांचे पाईक हा विचार घेऊन समता महोत्सव असा उत्तम उपक्रम घेण्यात आला आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कौतुक केले. हा समता महोत्सव महोत्सवापुरता सिमित राहू नये तर तो कायमच सुरू रहावा अशी अपेक्षा सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली 
छत्रपती शिवाजी महाराजांनी फौज उभी करुन स्वराज्य उभारले, महात्मा फुले यांनी लढा देऊन सर्वांना समान अधिकार दिला, शाहू महाराजांनी आरक्षण दिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले अशा महापुरूषांसमोर नतमस्तक व्हायला हवे अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी सरकारला आयोग नेमायला सांगितला होता. मात्र तो आयोग नेमला नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता हे ओबीसींच्या कमी लोकांना माहीत आहे याची आठवण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली. 
अजितदादा पवार, आणि मी जो काही आहोत तो बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहोत त्यामुळे त्यांच्या विचारांचा गौरव नेहमी व्हायला हवा असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 
आमचा हा विशेष बहुमान आहे. आमचा बहुमान केल्याबद्दल जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात धन्यवाद दिले 
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, अभिनेते मिलिंद शिंदे, बौध्द धर्मप्रचारक भदंत आर. आनंद, आंबेडकर साहित्य संग्रहाकार रमेश तुकाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या पानसरकर, प्रियदर्शनी जाधव, यांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले. 

बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात हा समता महोत्सव मोठया उत्साहात पार पडला. 
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित समता महोत्सव कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक - शेख, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार झिशान सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक आणि मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, माजी नगरसेवक कप्तान मलिक, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष विभू घुगे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी केले. तर यावेळी गजर भीम गीतांचा हा गायक आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम पार पडला.