विकसित कृषी संकल्प अभियानाचा हिंगोलीत प्रारंभ

विकसित कृषी संकल्प अभियानाचा हिंगोलीत प्रारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 30 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषि विज्ञान केंद्र तोंडापुर, जि. हिंगोली अंतर्गत विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रम कळमनुरी तालुक्यातील भोसी, तोंडापूर आणि वारंगा या गावांमध्ये तसेच सेनगाव तालुक्यातील ताकतोडा, साबलखेडा आणि कहाकर गावामध्ये संपन्न झाला.  
या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते जगन्नाथ पुरी येथे झाले. त्याचे थेट प्रक्षेपण वारंगा फाटा येथील कार्यक्रमात दाखवण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातही 'विकसित कृषी संकल्प अभियाना'चा उत्साहात प्रारंभ झाला.
या विकसित कृषि संकल्प अभियान भेटीचा मुख्य उद्देश खरीप हंगामाच्या पूर्व तयारीमध्ये मदत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि शासनाच्या योजनांची माहिती देणे हा आहे.   
या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. तिरुग्नानवेल यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य वेळेवर खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन केले.

 

 
प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरजित मुंडल यांनी माती नमुना कसा घ्यावा, त्याचे महत्त्व, माती परिक्षण नुसार खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन चिगुरे यांनी पावसाळ्यात जनावराची घ्यावयाची काळजी, एकात्मिक पद्धतीने किड व रोग व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व स्वच्छ दुध उत्पादन विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. किरणकुमार कोम्मू यांनी कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले व नवीन फळबाग लागवड याविषयी जमिनीची निवड व पाणी व्यवस्थापन  करणे गरजेचे आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम यांनी लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये बहार नियोजन कशाप्रकारे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करून फळ पिकांना तण आणि खत व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
या अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत किसान रथ अनेक गावामध्ये जाऊन विविध तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात येत आहे. तसेच विविध विषयाच्या घडीपत्रिका सुद्धा शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्या आहेत. 
या संपूर्ण कार्यक्रमाचे सनियंत्रण कृषी विज्ञान केंद्र, हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके आणि नोडल अधिकारी तथा गृह विज्ञान विषय विशेषज्ञ रोहिणी शिंदे यांनी केले. या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांचे नेतृत्व राजेश भालेराव विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) आणि डॉ. अतुल मो. मुराई, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) यांनी केले. त्यांना अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, साईनाथ खरात विषय विशेषज्ञ मृदा शास्त्र, डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक पशु विज्ञान यांनी सहाय्य केले.
या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी आणि ग्रामीण युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. इफकोचे प्रतिनिधी श्री. गोराड आणि आय.पी.एल.चे प्रतिनिधी यांनी देखील कृषि फवारणीसाठी ड्रोन प्रात्यक्षिकासह सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांकडून अभिप्राय नोंदवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय ठाकरे, गुलाबराव सूर्यवंशी, मारुती कदम, ओमप्रकाश गुडेवार व संतोष हाणवते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.