जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येहळेगाव तु. येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येहळेगाव तु. येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि.03 (जिमाका): केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने येहळेगाव तुकाराम येथे गुरुवार, (दि. 5) रोजी पर्यावरण दिनानिमित्त विशेष जनजागृती  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढते प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास, वन्य जीवांची शिकार, नद्यांचे प्रदूषण, शेतीत रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा अमर्याद वापर आणि अयोग्य जीवनशैली यामुळे पृथ्वीला हानी पोहचत आहे. या सर्व मानवनिर्मित आपत्ती पासून पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जगभरात सर्वत्र दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त ग्रामस्‍थांमध्‍ये जागृती निर्माण करण्यासाठी उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


‘प्‍लास्‍टीक प्रदूषण मुक्‍ती’ हे ब्रिद वाक्‍य घेऊन या वर्षीचा पर्यावरण दिन साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमात ग्रामस्‍थांच्‍या सहभागातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्‍यात येणार आहे तसेच नांदेड येथील जोशाबा सांस्‍कृतिक कलासंच यांच्‍या सांस्‍कृतिक कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्‍यात येणार आहे. यांनतर मान्‍यवर ग्रामस्थांच्‍यावतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
   या कार्यक्रमानिमित्त गावपातळीवर पर्यावरणावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतील. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरणाचे संवर्धन या विषयावर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्‍या आयोज‍नासाठी येहळेगाव येथील रेणुकाई सांस्‍कृति‍क क्रीडा मंडळ, पर्यावरण संवर्धनात सक्रिय कार्यरत असलेली सद्भाव सेवाभावी संस्‍था हिंगोली,  जायन्‍टस ग्रूप हिंगोली,  ग्रामपंचायत येहळेगाव, आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत येथील पर्यावरण मि‍त्रमंडळ, येहळेगाव येथील युवक मंडळ आदी संस्‍था सहभागी होणार आहेत 
या कार्यक्रमाला केंद्रीय संचार ब्‍यूरोचे प्रसिद्धी अधिकारी सुमित दोडल, उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रति‍क्षा भुते, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम, सरपंच, जिल्हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य तसेच सर्व पदाधि‍कारी, सद्भाव सेवाभावी संस्‍थेचे अभयकुमार भरतीया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.