भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा  
 भाजपा मुंबई अध्यक्ष आ.अमित साटम, आ.मिहीर कोटेचा, गायक अवधूत गुप्ते यांचे आवाहन 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथे करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज सायंकाळी 7 वाजता हा ‘मराठी दांडिया’ होणार असून यावेळच्या दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमीत साटम, मराठी दांडियाचे आयोजक व भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक अवधूत गुप्ते, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. या भव्य मराठी दांडीयाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन या सर्वांनी केले. 


यावेळी आ.कोटेचा म्हणाले की, मुंबईतील पहिला मराठी दांडिया भारतीय जनता पार्टीने  सुरू केला. या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष असून या मराठी दांडीयाला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून यंदा आम्ही विक्रोळीतील भव्य अशा छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे मराठी दांडिया कार्यक्रम ठेवला आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे आपल्या सुमधूर गायनाने मराठी दांडियाचे सादरीकरण करणार आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीतील व बॉलिवूडमधील सुप्रसिध्द कलाकारांची या कार्यक्रमात दररोज उपस्थिती राहणार आहे. हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला या मराठी दांडीयासाठी नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल. मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण करणाऱ्यांना रोज तीन आयफोन असे एकूण पाच दिवसांत 15 आयफोन, पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहेत. दररोज जवळपास 25 हजार प्रेक्षक या दांडियात सहभागी होतील अशी अपेक्षा असून या दांडियाचे यु-ट्यूब वर थेट प्रक्षेपण प्रेक्षक बघू शकतील, अशी माहितीही आ.साटम व आ.कोटेचा यांनी दिली.
यावेळी श्री. साटम म्हणाले की, भाजपा नेहमीच सर्व समाजांना बरोबर घेऊन पुढे जात असतो. भाषा किंवा समाजाच्या आधारे भेदभाव न करता सर्वांसाठी विकासाचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला मराठी माणसाची आठवण येत नाही तर मराठी माणूस आमच्या हृदयात कायम वास करून असतो असे म्हणत श्री. साटम यांनी विरोधकांना चिमटा काढला.