हिंगोली (जिमाका), दि. 23 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी)मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले जाते.
संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा 2024 परीक्षेच्या दिनांक 22 एप्रिल, 2025 रोजी लागलेल्या निकालात बार्टीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या निकालात बार्टी संस्थेच्या तब्बल 11 विद्यार्थ्यांची निवड झाली असून विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे रँक मिळाल्या आहेत...
1) आयुष राहुल कोकाटे - रँक 513, 2) बुलकुंडे सावी श्रीकांत - रॅंक 517, 3) प्रांजली खांडेकर- रॅंक 683, 4) राजूरकर अतुल अनिल - रँक 727, 5) खंदारे मोहिनी प्रल्हाद - रॅंक 844, 6) सरवदे अजय नामदेव- रॅंक 858, 7) अभिजय पगारे- रॅंक 886, 8) पानोरेकर हेमराज हिंदुराव- रॅंक 992, 9) बोराडे प्रथमेश सुंदर- रॅंक 926, 10) जाधव सुमेध मिलिंद- रॅंक 942, 11) सदावर्ते आनंद राजेश- रॅंक 945.
कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि संसाधनांचा प्रभावी वापर यांच्या जोरावर त्यांनी हे अत्युच्च यश संपादन केले आहे. यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते आणि त्यामधील यश ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.
बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि कौशल्यवृद्धीच्या दिशेने चालना देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. यंदाचे युपीएससी मधील विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे.”
केंद्रीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजातील विध्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. बार्टीने त्यांच्या यशाचे औचित्य साधून भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यापक आणि सुसज्ज प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शखाली व सामाजिक न्याय विभागाच्या या पुढाकारामुळे अनेक विद्यार्थी सशक्त होत असून, समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाची दखल देशभरात घेतली जात आहे.
महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार यांनी या निकालात 11 विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, यूपीएससी विभाग प्रमुख शुभांगी पाटील व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले.
__
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत/फोटो
अतुल अनिल राजूरकर
मी नांदेड येथून बीई केले आहे. माझे वडील टेलिफोन ऑपरेटर होते. बाबासाहेबांच्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या विचाराने प्रेरीत होऊन अनेक अपयशावर मात करीत मी युपीएससी पास झालो आहे. या प्रवासात बार्टीच्या युपीएससी नागरी सेवा आर्थिक सहाय्य योजनेची मुख्य परीक्षेस आणि मुलाखतीस खूप मदत झाली. टेस्ट सिरीज लावता आली. मुलाखतीसाठीची तयारी करता आली. बार्टीमुळे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार झाले.
मोहिनी प्रल्हाद खंडारे
माझे शालेय शिक्षण यवतमाळ पुसद येथून झाले. बीई केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात काम न करता सार्वजनिक क्षेत्रात आपल्या लोकांसाठी काम करावे वाटले. आणि युपीएससीच्या तयारीला लागले. सोबत बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा होतीच. आईवडिलांचे, दादाचे सहकार्य होते. वडील शिक्षक होते. खूप प्रयत्नांनी युपीएससी पास झाले. बार्टीच्या युपीएससी नागरी सेवा आर्थिक सहाय्य योजनेची मुख्य परीक्षेस आणि मुलाखतीस खूप मदत झाली. निश्चिंत होऊन अभ्यास करता आला. यशस्वी होता आले.
***