अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
        महिन्याच्या पहिल्या बुधवारी कार्यशाळेचे आयोजन
 
 
हिंगोली, दि.05 (जिमाका): स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या वेळापत्रकाचे नियोजन, सातत्य, सराव आणि आत्मविश्वास ठेवल्यास कुठलेही ध्येय सहज साध्य करता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिवाजीराव देशमुख सभागृह येथे नुकत्याच आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा प्रसंगी बोलताना केले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या वतीने जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचे वैयक्तिक अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. परीक्षेकरिता उपलब्ध असणारा कालावधी आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे, वेळेचे नियोजन, केलेल्या अभ्यासाचा सारांश आणि त्याचा सराव, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव आणि त्यातून स्वतःची गुणवत्ता पारखणे आवश्यक आहे. याचबरोबर स्वतःवरील खंबीर आत्मविश्वास, इतरांशी तुलना न करता केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करून परीक्षांना सामोरे जा. एका प्रयत्नात यश मिळाले नाही तरी खचून न जाता अधिक उमेदीने पुन्हा तयारीला लागा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असा विश्वास देखील  जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला.
या चर्चासत्राला शहरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमप्रतिनिधी प्रद्युम्न गिरीकर यांनी केले.
दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मार्गदर्शन कार्यशाळा
स्पर्धा परीक्षा मधून यश मिळवून शासकीय सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत महिन्याच्या पहिल्या बुधवारी अशा प्रकारचे चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करण्याचा संकल्प यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अनुभवी व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे अधिक सोपे जाईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे हिंगाली जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. त्यांना शहरातच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शासकीय नोकरीमध्ये हिंगोलीकर विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल, आणि इतरांनाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.