आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे  - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता   हिंगोली

हिंगोली (जिमाका),दि. 10 : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, प्र.पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.


पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना जिल्हाधिकारी  श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  व महावितरण विभागांनी समन्वयाने मॉकड्रिलची तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.  
तसेच आरोग्य विभागानेही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पुरेसा औषधी साठा तयार ठेवावा. तसेच शासकीय रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा रक्त पुरवठा उपलब्ध करुन ठेवावा. तसेच सीपीरची, जनरेटरची व्यवस्था करावी.  जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या  आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. 
प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमावेत. त्यांच्यासोबत योग्य समन्वय ठेवावा. सर्व कार्यान्वीन यंत्रणेचे संपर्क क्रमांक अद्यायावत करावेत. आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शाळा, मंगल कार्यालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा धान्य पुरवठा व इंधन पुरवठा तयार ठेवावा. जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करावी. जिल्ह्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द कराव्यात. जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करावी. चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करावी. नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामस्तरावर नोडल अधिकाऱी नेमून त्यांच्यामार्फत जनजागृती करावी. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्यावी.
तसेच मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे. तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूरप्रवण गावाला भेटी देऊन भविष्यात पूर येणार नाही, यासाठी उपाययोजनांची  माहिती  घेऊन तशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.  
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, सर्व तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुढे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.