ठाण्यात १६ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

ठाण्यात १६ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

ठाणे,दि.25 (जिमाका): लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने '१६ वा राष्ट्रीय मतदार दिन' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. "माझा भारत, माझे मत, मी भारत आहे" या मुख्य संकल्पनेवर आधारित हा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


      यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी(रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (मेट्रो सेंटर) वरुणकुमार सहारे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील,  तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात, उमेश पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार स्मितल यादव, निवडणूक दूत नीता केणे (किन्नर अस्मिता), अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे सिटीजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक शाखेतील इतर अधिकारी-कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली.
लोकशाहीत मतदारांचे स्थान सर्वोच्च.. 
    -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
       यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, "भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला आहे. ठाणे जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेला जिल्हा असून, १८ विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक पात्र मतदाराने नोंदणी करणे आणि मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. सध्या राबविल्या जाणाऱ्या 'एसआर' (मतदार पुनरिक्षण) कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त युवकांनी आपली नावे नोंदवावीत. कलाकारांच्या माध्यमातून होणारी जनजागृती ही अधिक प्रभावी ठरते, म्हणूनच आज सिनेसृष्टीतील मान्यवर या मोहिमेत सहभागी झाले आहेत."
     ते म्हणाले, लोकशाही म्हणून आपल्या देशातील स्थिरता वादातीत आहे. संपूर्ण जगासमोर भारतीय लोकशाही एक सुदृढ लोकशाही म्हणून आदर्श आहे. संविधानाने लोकशाहीच्या माध्यमातून भारत देशातील प्रत्येक घटकाला अधिकाररुपी बळ दिले आहे. भारतात सर्वोच्च कुणीही नाही, सर्वोच्च आहे ती फक्त लोकशाही.
सिनेकलाकारांची उपस्थिती आणि जनजागृतीचा जागर...
     या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग, अभिनेता अमेय वाघ आणि हरीश दुधाडे यांची विशेष उपस्थिती होती.
आधी मतदानाला जायाचं...मंग सहलीला जायाचं...!
               -दिग्दर्शक लेखक हेमंत ढोमे 
     याप्रसंगी हेमंत ढोमे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करीत, आपल्या 'क्रांतीज्योती विद्यालय' चित्रपटाचा उल्लेख करून मराठी भाषेचा आणि कर्तव्याचा गौरव केला. 
     ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी आधी स्वतःवर आणि या व्यवस्थेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. मतदान करण्याचा मानसिक आनंद, समाधान वेगळेच असते. म्हणूनच राष्ट्रीय कर्तव्याची जाण ठेवून भारताला संपूर्ण विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपले सर्वांचे सक्रिय योगदान आवश्यक आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीकडे केवळ मजा म्हणून न पाहता "आधी मतदानाला जायाचं... मंग सहलीला जायाचं..! अशा शब्दात मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले.
मतदानाच्या अधिकाराकडे सकारात्मक व कर्तव्य भावनेने पाहणे गरजेचे 
        - ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर 
ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण करमरकर यांनी लोकशाहीतील मतदानाचे सांख्यिकीय महत्त्व आणि महिलांच्या सहभागावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, घटनाकाराने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहायला हवे आणि त्यासाठी सर्वांनी सकारात्मक व कर्तव्य भावनेने निवडणुकीतील मतदानाच्या अधिकाराकडे पाहायला हवे. मतदानाच्या अधिकाराबरोबरच मतदानाचे कर्तव्य निभावणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या व्यवस्थेचे मूल्यमापन जरी आपल्या हातात असले तरी कर्तव्य म्हणून घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार मात्र आपण नक्कीच वापरायला हवा. 
    निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी या लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीमुळे मतदार जनजागृतीला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला.
गुणवंत अधिकारी व विद्यार्थ्यांचा गौरव...
    याप्रसंगी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओ, संगणक चालक आणि विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्यांची नावे पुढीलप्रमाणे...
 विजेते विद्यार्थी: 
चित्रकला स्पर्धा..
  १) कु. दिव्या संतोष नारकर, प्रथम
२) कु. मोरे स्वराली शितल प्रविण, व्दितीय
३) कु. आर्या विनायक डिगे, तृतीय
निबंध स्पर्धा...
१) कु. शर्वरी शशिकांत बनसोडे, प्रथम
२) कु. गायत्री जाधव, व्दितीय
३) कु. मनाली संतोष शिरसाठ, तृतीय
उत्कृष्ट घोषवाक्य..
१) कु.आर्यन प्रज्ञेश सोढा, प्रथम
२) श्री.उमेश रघुनाथ गांगोडा, व्दितीय
३) श्रीम.लीना बल्लाळ, तृतीय
वत्कृत्व स्पर्धा..
१) कु.समेका प्रविण क्रांबळे, प्रथम
२) कु.अमृता दत्ता थोस्त, व्दितीय
३) कु.सई राजेश साळवी, तृतीय
नवीन मतदार ओळखपत्रांचे वाटप..
 नवमतदार: साक्षी प्रमोद कापसे, कोमल प्रमोद कापसे, ईश्वर राव गुथुला, सोनम राधेश्याम चौधरी, श्रीकांत राजाराम घुले, युवराज पाटील, अभिजीत गौतम जाधव, करुणा रवी सोनावणे, रसिका गोपाळ राठोड, सादिया मो.आयु.खान, रेश्मा कुडेकर, यामिनी कुचलाहे यांना नवीन मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
 उत्कृष्ट कर्मचारी सन्मान: 
  संगणक चालक समीर शेख, प्रमोद पगारे, केतन मोरे, शहीरा फिरोज अहमद अन्सारी.
विविध केंद्रांवरील बीएलओ व नाईक (शिपाई) यांचा सन्मान... 
     पंढरीनाथ चौधरी, सुखलाल परदेशी, निलेश नरवडे, राहुल हिंदुराव, विनीत पाचपांडे, गणेश राऊत, बळीराम वाघचौरे, प्रदीप पाटील, सलीम शेख, राजेंद्र गुप्ता, अरविंद माळी, इमरान आलमवाले, जितेंद्र कांबळे, राजेश गायकवाड, श्रुती टोळकर, गणेश सावंत, सविता कांबळे, अमित म्हात्रे व शिपाई संदेश बदले यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
     महसूल सहाय्यक चांदपाशा शेख, परमेश्वर जामदार, रामचंद्र जाधव तसेच निवडणूक नायब तहसिलदार मदन शेलार, डी.बी.चौधरी यांच्यासह सेवानिवृत्त नायब तहसिलदार प्रदीप मुकणे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती स्वाती घोंगडे आणि उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील व उर्मिला पाटील यांचा देखील मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
     याप्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा संदेश तसेच मतदान जनजागृतीपर "मैं भारत हू..!" हे प्रोत्साहनात्मक गाणे उपस्थित मतदारांसाठी प्रसारित करण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी राष्ट्रीय मतदान दिवसाचे महत्त्व विषद केले, तर आभार प्रदर्शन तहसिलदार प्रदीप कुडाळ यांनी मानले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. तरुलता धानके यांनी केले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सूत्रसंचलनासाठी त्यांचाही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.